शंकर भाऊ साठे :
(२६ ऑक्टोबर १९२५ – ११ मार्च १९९६).
महाराष्ट्रातील शाहीर व साहित्यिक. अण्णाभाऊ साठे यांचे कनिष्ठ बंधू म्हणून शंकर भाऊ साठे हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. तसेच ते शाहीर व साहित्यिक म्हणूनही सुपरिचित आहेत. ' माझा भाऊ आण्णाभाऊ ' ( १९८० ) हे त्यांचे आत्मकथनात्मक चरित्र प्रसिध्द आहे. अण्णाभाऊंचे जीवन आणि कार्य समजून घ्यायला हे आत्मपर लेखन महत्त्चाचे आहे. एकच काडतूस (१९८४), सूड (१९८५), सगुणा (१९८६), घमांडी (१९८६), सावळा (१९८६),जग (१९८६), लखू (१९८७), बायडी (१९९१), सुगंधा (१९९१), बाजी (१९९१), काळा ओढा इत्यादी कादंबऱ्या प्रकाशित आहेत. त्यापैकी शामगाव या कादंबरीची काही पाने जिर्णावस्थेत उपलब्ध आहेत. यातील दोन कादंबऱ्यांची माहिती उपलब्ध नाही.
शंकर भाऊंनी अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवर आधारीत फकिरा या मराठी भाषेतील चित्रपटात फकिराच्या एका दरोडेखोर साथीदाराची भूमिका केली होती. अन्यायाची चीड, शोषितांच्या विषयी हृदयात आपुलकी, वास्तव कथानक, प्रभावी घटना-प्रसंग, विचारप्रवण संवाद, विषम समाजव्यवस्थेवर घणाघाती प्रहार, हे त्यांच्या कादंबरी लेखनाचे विशेष नोंदवता येतील. त्यांनी रेखाटलेल्या नायक-नायिका ह्या बंडखोर, कष्टाळू, धाडसी, करारी बाण्याच्या,आपल्या भावनांना प्रगट करणाऱ्या तसेच मानवी जीवनमूल्ये जोपासणाऱ्या आहेत. ( संदर्भ - मराठी विश्वकोश)