( १० मार्च १९२९ - ३० डिसेंबर २०१५ )
पाडगावकरांचा ‘धारानृत्य’ हा पहिला संग्रह १९५० साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर आजतागायत पाडगावकरांची एकूण ४२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नाट्यकविता, बालकविता, उपहासपर कविता (वात्रटिका), गझल या स्वरूपाची काव्यरचना पाडगावकरांनी केली .आधी भावकवी आणि नंतर गीतकार असे स्थित्यंतर झाल्यामुळे कवीचे हळुवार, तरल, संवेदनशील मन रस-रंग-नाद-गंध-स्पर्शयुक्त शब्दांच्या आधारे संगीतानुकूल झाले. ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘असा बेभान हा वारा’, ‘भेट तुझी माझी स्मरते’, ‘श्रावणात घन निळा बरसला’ ह्या पाडगांवकरांच्या गीतांनी रसिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करून ठेवले आहे. ‘तुझे गीत गाण्यासाठी’ (१९८६) या गीतसंग्रहाप्रमाणेच पाडगावकरांचा ‘गझल’ हा संग्रहही उल्लेखनीय आहे. बालकविता हा काव्यप्रकारही पाडगावकरांनी आत्मसात करून मुलांसाठी प्रामुख्याने गेय बालगीते लिहिली आहेत- ‘भोलानाथ’ (१९६४), ‘बबलगम’ (१९६७), ‘चांदोमामा’ (१९९२), ‘सुट्टी एके सुट्टी’ (१९९२), ‘वेडं कोकरू’ (१९९२), ‘आता खेळा नाचा’ (१९९२), ‘झुले बाई झुला’ (१९९२), ‘अफाटराव’ (२०००). केवळ शब्दांशी बांधील राहून काव्यलेखन करणार्या पाडगावकरांनी ‘निंबोणीच्या झाडामागे’ ह्या लघुनिबंध संग्रहाखेरीज गद्यलेखन केले नाही. मात्र संतसाहित्य, धर्म आणि तत्त्वज्ञान यांत रस असलेल्या पाडगावकरांनी मीरा, कबीर, सूरदास ह्या मध्ययुगीन संत कवि-कवयित्रींच्या रचनांचे अनुवाद केले आहेत. वस्तुतः कवितेचा अनुवाद करणे बरेच अवघड असते. पण मीरेच्या आणि कबिरांच्या मूळ पदांचे अनुवाद पाडगावकरांनी मूळ आशयाला बाधा न आणता केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचे पुरस्कार पाडगावकरांच्या ‘जिप्सी’ (१९५३), ‘छोरी’ (१९५७), ‘बबलगम’ (बालगीत संग्रह), (१९६७) या काव्यसंग्रहांना लाभले आहेत. पाडगावकरांना १९९० साली ‘महाराष्ट्र गौरव पुरस्काराने’ तर २००८ साली ‘महाराष्ट्र भूषण’ ह्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. पहिल्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे (चिपळूण, १९९८) ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)