(२९ एप्रिल १९०९–११ ऑक्टोबर १९६८).
महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाजसुधारक. मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर. आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे किर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. एके दिवशी गुरूमहाराजांनी माणिकला ‘तुकड्या’ म्हणून हाक मारली व म्हटले, की ‘तुका म्हणे’ असे किती दिवस म्हणशील? ‘तुकड्या म्हणे’ असे म्हणत जा....‘तुकड्या म्हणे’ या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले.
ईश्वरभक्ती, सद्गुणांचा उपदेश,सामाजिक जागृती इ. विषय त्यांनी आपल्या कीर्तनांतून हाताळले, म्हणूनच त्यांना जनतेने ‘राष्ट्रसंत’ अशी उपाधी देऊन गौरविले. तुकडोजी महाराजांचे कवित्व अस्सल आहे. कीर्तने व खंजिरी भजने यांच्या माध्यमातून समाजसेवा हे तुकडोजींचे ध्येय होते. त्यासाठी परंपरागत अनिष्ट रूढी, जातिधर्मपंथभेद,अंधश्रद्धा इ. समाजघातक गोष्टींवर कठोर प्रहार करून ईश्वराचे विशुद्ध स्वरूप त्यांनी लोकांसमोर मांडले. त्यामुळे सर्व धर्माचे, सर्व पंथांचे लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले. आत्मसंयमाचा आणि देशभक्तीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम केले. गावोगावी ‘गुरुदेव सेवा मंडळे’ स्थापली.
व्यायामाचे महत्व सांगण्यासाठी आदेशरचना हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आपल्या मतांच्या प्रचारार्थ त्यांनी विपुल ग्रंथरचना केली. त्यांची सु. चाळीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. ४१ अध्यायांचे ४,६७५ ओवीसंख्या असलेले ग्रामगीता हे त्यांचे प्रसिद्ध काव्य होय. त्यांनी हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांत काव्यरचना केली. त्यांचे कवित्व जातिवंत असून ते आधुनिक संतप्रवृत्तीचे निदर्शक आहे. १९४२ च्या आंदोलनात भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगात त्यांनी सुविचारस्मरणी हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यानंतर भूदान, अस्पृश्योद्धार, जातिनिर्मूलन इ. कार्यांकडे त्यांनी विशेष लक्ष पुरवले. विश्वधर्म व विश्वशांती परीषदेसाठी १९५५ मध्ये ते जपानला गेले. त्यांच्या भजनाने अनेक पाश्चात्य व पौर्वात्य विद्वान मोहीत झाले. १९६६ मध्ये प्रयाग येथे विश्व हिंदू परिषदेचे ते अध्यक्ष होते.
( संदर्भ - मराठी विश्वकोश)